नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १९ हजारांच्या पुढे गेला आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात एक हजार ८९ नवीन रुग्ण आढळले आहेत. याबरोबरच रुग्णांचा आकडा १९ हजार ६३ झाला आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात ३७ रुग्ण दगावले असून, मृत्यू झालेल्यांचा आकडा ७३१ झाला आहे. ३ हजार ४७० रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत ७४८ नवीन रुग्ण सापडले आहेत. मुंबईतल्या रुग्णांची संख्या ११ हजार ९६७ झाली आहे.

रायगड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कोरोनाचे १७ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातल्या करोनाबाधितांची संख्या २०७ वर पोचली आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीत ८, पनवेल ग्रामीण भागात ७ रुग्ण तर अलिबाग इथं १, आणि उरण इथं १रुग्ण आढळला आहे.  चिंताजनक बाब म्हणजे दिवसभरात करोनामुळे चौघांचा मृत्यू झाला आहे. यात पनवेल महानगरपालिका हद्दीत ३ तर ग्रामीण भागातल्या एका व्यक्तीचा समावेश आहे.त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या  ८ झाली आहे.

नांदेड शहरात कोरोना विषाणूची लागण झालेले आणखी दोन रुग्ण आज आढळल्यानं शहरतील या रुग्णांची संख्या चाळीस झाली आहे. हे दोन्ही रूग्ण जम्मू काश्मीरचे रहिवासी असून ते गुरूद्वाराच्या दर्शनासाठी आले होते.  त्यांच्यावर नांदेडमधील कोविड केंद्रात उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.

नाशिक जिल्ह्यात आज कोरोना विषाणूचे नवे पन्नास रुग्ण आढळल्यानंतर या रुग्णांची एकूण संख्या सहाशे बावीस झाली आहे. नव्या पन्नास रुग्णांमधील एकोनपन्नास रुग्ण मालेगांवचे असून एक नाशिक शहरातील आहे. जिल्ह्यातील सहाशे बावीस पैकी चारशे सत्त्यान्नव रुग्ण मालेगांवचे असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

धुळे इथं काल रात्री तब्बल १८ रूग्णांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. या नविन रुग्णामुळे धुळ्या तल्या कोरोनाबाधीतांची संख्या ५२ वर पोचली आहे.