पुणे : पुणे येथे शिकणारे जम्मू-काश्मीरचे ६५ विद्यार्थी व १५ नागरिकांना घेऊन महामंडळाच्या तीन गाड्या नागपूरला रवाना झाल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. तेथून हे सर्व ८० जण जम्मू काश्मीरला रेल्वेने जातील. लॉकडाऊनमुळे पुणे जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील मजूर, कामगार, विद्यार्थी यांना त्यांच्या राज्यात अटी-शर्तींची पूर्तता करून जाऊ देण्याचा शासनाने निर्णय घेतला.

त्यानुसार पुणे शहर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वय अधिकारी नीता शिंदे आणि समन्वय सहायक विवेक जाधव यांनी नियोजन केले. या नागरिकांकडून हमीपत्र भरून घेणे, आरोग्य तपासणी करणे याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात आली. तीनही बस रवाना करण्यापूर्वी फूड पॅकेट, पिण्याचे पाणी यांची व्यवस्था करण्यात आली. सोशल डिस्टन्सिगचे पालन, मास्कचा वापर या सर्व बाबींचा अवलंब करण्याच्या सर्व प्रवाशांना सूचना देण्यात आल्या होत्या.