मुंबई : सुपर सायक्लॉनच्या धोक्यामुळे ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या समुद्र किनाऱ्यावर सुपर सायक्लॉन अम्फान या वादळाचा धोका लक्षात घेऊन दिनांक २१ मे नंतर ओडिसा आणि पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या श्रमिक रेल्वे रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे सचिव पराग जैन यांनी दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीत अडकलेल्या श्रमिकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी विविध ठिकाणाहून श्रमिक रेल्वे सोडण्यात येत आहेत. त्याद्वारे सुमारे चार लाख श्रमिकांना विविध राज्यात सुरक्षित पोहोचविण्यात आले आहे. मात्र, पश्चिम बंगालमध्ये उद्भवलेल्या अम्फान या वादळामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत.  ही बाब लक्षात घेऊन या राज्याकडे जाणाऱ्या मजुरांनी गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सर्व उपाययोजना करून श्रमिक रेल्वेद्वारे आजतागायत उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, जम्मू काश्मिर, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, गुजरात, राजस्थान, तामिळनाडू या राज्यात सुमारे चार लाख श्रमिकांना सुरक्षित पोहोचविण्यात आले आहेत.