मुंबई : केंद्र शासनाच्यावतीने विविध क्षेत्रात गुंतवणूक वाढीसाठी तयार केलेल्या इन्व्हेस्ट इंडिया फोरमध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज महाराष्ट्र शासनाची भूमिका विशद केली. इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मिती उद्योग क्षेत्रातील गुंतवणूकीवर वेबिनारमध्ये चर्चा करण्यात आली. या क्षेत्रात गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र योग्य ठिकाणी असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले.

श्री.देसाई म्हणाले की, महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मिती क्षेत्राच्या वाढीला मोठी संधी आहे. सध्या कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. परंतु गॅझेट वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. घरी राहून काम करणाऱ्यांना देखील इलेक्ट्रॉनिक गॅझेटमुळे मोठी मदत झालेली आहे. पुढील काळात इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मिती क्षेत्राची मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील गुंतवणुकदारांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी. त्यांना सर्व सुविधा व सोयी उपलब्ध करून दिल्या जातील.

सध्या महाराष्ट्र शासनाचे इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मिती क्षेत्रासाठी विशेष धोरण आहे. त्याद्वारे काही सवलती दिल्या जात आहेत. गुंतवणुकदारांना योग्य प्रोत्साहने दिली जात आहेत. याशिवाय डेटा सेंटर्स, विकास आणि संशोधन केंद्र, सुसज्ज इंटरनेट जाळे आदीमुळे गुंतवणूकदार महाराष्ट्राला अधिक पसंती देतात. येथे मुबलक प्रमाणात व दर्जेदार मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्यामुळे देश-विदेशातील गुंतवणुकदारांनी या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी महाराष्ट्राची निवड करावी, असे आवाहन श्री.देसाई यांनी केले.

या चर्चासत्रात उत्तर प्रदेश, गुजरात, तेलंगना राज्यांनी सहभाग घेतला होता.

राज्यात ५१ हजार उद्योग सुरू

दरम्यान, इंडिया मर्चंट चेंबर्सच्या वेबिनारमध्ये श्री.देसाई यांनी उद्योगाच्या सद्यस्थितीची माहिती दिली. ते म्हणाले की, राज्यात सध्या ५१ हजार उद्योग सुरू झाले आहेत. १३ लाख कामगार या ठिकाणी रुजू झाले आहेत. छोट्या व मध्यम उद्योगांसाठी राज्य शासन विवध योजना जाहीर करणार आहे. मजुरांसाठी कामगार ब्युरोची स्थापना करण्यात आली आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.