मुंबई (वृत्तसंस्था) : मंत्रालय आणि अन्य शासकीय कार्यालयांमध्ये सोमवारपासून पंधरा टक्के उपस्थिती अनिवार्य केल्यामुळे, या कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळानं, अतिरिक्त २५० बस सोडण्याचं नियोजन केलं आहे. या बस, पनवेल, पालघर, आसनगाव ,विरार ,नालासोपारा ,वसई, बदलापूर इथून मुंबईत येणार असून, पैकी १४२ बस मंत्रालय, १५ बस महानगरपालिका भवन मार्ग या गंतव्य स्थानांसाठी, तर उर्वरित सुमारे १०० बस, मुंबई महानगर प्रदेशा अंतर्गत अत्यावश्यक सेवेसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकरता धावतील.सध्या त्यांच्यासाठी सुमारे ४०० बस धावत आहेत अशी माहिती एस टी च्या जनसंपर्क कार्यालयानं दिली आहे.

या ४०० बसद्वारे दररोज ८०० पेक्षा जास्त फेऱ्या केल्या जात असून, दररोज सुमारे १४-१५ हजार अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची, सुरक्षित ने-आण केली जात आहे. यात डॉक्टर, परिचारिका, शासकीय कर्मचारी, मुंबई महापालिकेचे कर्मचारी, सफाई कामगार, पोलीस, अग्निशामक दलाचे कर्मचारी यांचा समावेश आहे. या सर्व बसचं योग्य रीतीनं नियमीत निर्जंतुकीकरण करुन, प्रवासात सुरक्षित अंतराच्या नियमांचं काटेकोर पालन करण्यात येत आहे आणि करण्यात येणारही आहे, असं एस टी प्रशासनानं कळवलं आहे.