मुंबई : केंद्र शासनाकडून चंदन व औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी मिळणारे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार असून त्यामुळे राज्यातील हजारो औषधी वनस्पती उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मंत्रालयात आज अहमदनगर व अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषिमंत्री डॉ. बोंडे यांची भेट घेतली. यावेळी कृषिमंत्री डॉ. बोंडे म्हणाले, राज्यात पान पिंपरी, शतावरी यांसारख्या औषधी वनस्पतींची मोठ्या प्रमाणात लागवड होते. तसेच राज्यातील काही भागात चंदनाचे देखील उत्पादन घेतले जाते. यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.  चंदन व औषधी वनस्पतींच्या शेतीसाठी केंद्र शासनाच्या आयुष अभियानांतर्गत प्रति हेक्टरी 58 हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. ते त्वरित उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.