नवी दिल्ली : कोविड-१९ साथीविरुद्ध लढाई सुरुच आहे, यावर लस उपलब्ध नसल्यानं फक्त मास्क, आणि सुरक्षित अंतर हाच यावरचा उपाय आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज स्वावलंबी उत्तर प्रदेश रोजगार अभियान सुरु करताना बोलत होते.

रोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण करण्यासाठी स्वयंरोजगार तसंच औद्योगिक संस्थांमध्ये भागीदारीला चालना देणं हा या अभियानाचा उद्देश आहे. दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या लोकार्पण कार्यक्रमात पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातल्या सहा जिल्ह्यातल्या ग्रामस्थांशी संवाद साधला.

उत्तर प्रदेश सरकारनं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या कामाची त्यांनी प्रशंसा केली. उत्तर प्रदेश सरकारनं कोरोना संक्रमण रोखण्यात ज्या प्रकारे यश मिळवलं ते अनुकरणीय आहे, असं मोदी म्हणाले.