नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या राष्ट्रीय संस्थांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या सत्राच्या परीक्षा रद्द करण्याची सूचना राष्ट्रीय संस्था आणि विद्यापीठांना करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

या अभ्यासक्रमांमध्ये ऑल इंडिया काऊंसिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, काऊंसिल ऑफ आर्किटेक्चर, फार्मसी काऊंसिल ऑफ इंडिया, बार काऊंसिल ऑफ इंडिया, नॅशनल काऊंसिल ऑफ टिचर्स  एज्युकेशन, नॅशनल काऊंसिल फॉर  हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी, यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रम संस्थाचा समावेश आहे.

कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर सध्याचं वातावरण कोणत्याही परीक्षा किंवा वर्ग सुरु करण्यासाठी अनुकूल नाही. राज्य शासनानं  अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे, त्याला मान्यता देण्याचे निर्देश राष्ट्रीय स्तरावरच्या संस्थांना द्यावेत, असं मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटलं आहे.