नवी दिल्ली : अवजड उद्योग विभागाने देशभरातील 64  शहरे, राज्य सरकारच्या संस्था, राज्यांचे परिवहन विभागांना शहरांतर्गत आणि शहरांना जोडणारी वाहतूक करण्यासाठी विजेवर चालणाऱ्या 5595 बसना मंजुरी दिली आहे. फेम इंडिया योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात सार्वजनिक वाहतूक अधिक पर्यावरण पूरक करण्याच्या उद्देशाने ही मंजुरी देण्यात आली आहे. या बसेस चालवण्यासाठी विभागाने राज्य/ केंद्रशासित प्रदेशांच्या राजधान्या, स्मार्ट सिटी आणि विशेष दर्जा असलेल्या शहरांमधून स्वारस्यपत्रे मागवली होती.

26 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांकडून 14988 ई- बस चालवण्याचे  प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यांची छाननी केल्यावर प्रकल्प अंमलबजावणी आणि मंजुरी समितीच्या सल्ल्याने सरकारने 5095 बस चालवण्याला मंजुरी दिली आहे.दिल्ली मेट्रो रेल्वे ला जोडण्यासाठी 100 आणि शहरांतर्गत वाहतुकीसाठी 400 बस दिल्या जाणार आहेत.

या बस त्यांच्या कंत्राट कालावधीत सुमारे 4 अब्ज किलोमीटर धावण्याची आणि सुमारे 1.2 अब्ज लीटर इंधनाची बचत करण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे 2.6 दशलक्ष टन कार्बनडायऑक्साईड उत्सर्जनाला आळा बसेल.