भारताला 21 व्या शतकातील नवनिर्मितीचे केंद्र बनवा

महिलांचे शिक्षण ही लोकचळवळ बनली पाहिजे

माध्यमिक शाळेच्या पातळीपर्यंत मातृभाषा शिक्षणाचे प्राथमिक माध्यम बनवा

आपल्या शिक्षण प्रणालीला जागतिक दर्जाचे बनवण्यासाठी प्रबोधन घडवण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन

नवी दिल्ली : धार्मिक एकात्मता आणि विविधेतेमधील एकता ही आपल्या संस्कृतीची प्रदीर्घ काळापासून जपलेली मूल्ये आहेत आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या या मूल्यांचे देशाच्या प्रत्येक नागरिकाने जतन करावे असे आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केले आहे.

ते आज मध्य प्रदेशात इंदूर येथे श्री वैष्णव विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या दीक्षांत कार्यक्रमात बोलत होते. 135 वर्षे जुन्या असलेल्या श्री वैष्णव समिती आणि विश्वस्त समूहाने दर्जेदार शिक्षण देण्याच्या उद्देशाने श्री वैष्णव विद्यापीठ विश्वविद्यालयाची स्थापना करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची उपराष्ट्रपतींनी प्रशंसा केली.

आपल्या शिक्षण प्रणालीला जागतिक दर्जाचे बनवण्यासाठी  या प्रणालीचे पुनरुत्थान आणि प्रबोधन होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शिक्षण संस्थांनी शैक्षणिक प्रावीण्य, शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक तत्परता, नैतिक मूल्यांचे महत्त्व आणि सामाजिक भान यावर भर दिलाच पाहिजे, असे ते म्हणाले. दर्जा, समानता आणि ज्ञानजालाच्या निर्मितीच्या माध्यमातून शिक्षणाची उपलब्धता, संशोधन आणि नवनिर्मिती केंद्रांची उभारणी, कौशल्य विकास कार्यक्रम आणि अध्यापन विकासासाठी पाठबळ याविषयीच्या आव्हानांवर मात करण्यासाठी विद्यापीठांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

आपल्या समृद्ध संस्कृतीचे जतन करण्याचे महत्त्व विशेषतः आपल्या भाषांच्या संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करतात. त्यांनी सांगितले की आपल्या शाळांमध्ये माध्यमिक शाळेतील शिक्षणासाठी मातृभाषा हेच प्राथमिक माध्यम असले पाहिजे.

महिलांचे शिक्षण आणि सक्षमीकरण ही लोकचळवळ बनवण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला. तरुणांनी आपल्यामध्ये दुसऱ्याची काळजी घेण्याची आणि आपल्याकडचे काही दुसऱ्याला देण्याची वृत्ती निर्माण केली पाहिजे, विशेषतः समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांसाठी त्यांनी सहानुभूती बाळगली पाहिजे, अशी अपेक्षा उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली.