नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दलितांवरचे अत्याचार रोखण्याबाबत राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याची टीका रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात टाळेबंदीमधे राज्यात अनेक ठिकाणी दलितांवर हल्ले झाल्याचे, घरे जाळल्याचे, दलित बौद्ध तरुणांच्या हत्या झाल्याचे निषेधार्ह प्रकार घडलेत. या अत्याचारांच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं उद्या तीव्र निषेध आंदोलन केलं जाणार आहे, अशी घोषणाही आठवले यांनी केली आहे. सुरक्षित अंतर ठेवून हे आंदोलन केलं जाईल, असं त्यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे.