मुंबई : सेवानिवृत्त आयएएस अधिकारी, राज्याच्या पहिल्या महिला निवडणुक आयुक्त, ज्येष्ठ साहित्यिक श्रीमती नीला सत्यनारायण यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. प्रशासकीय सेवा आणि साहित्य क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या युवकांसाठी त्या मार्गदर्शक, प्रेरणास्त्रोत होत्या. त्यांच्या निधनाने आपण एका कुशल प्रशासकाला, संवेदनशील साहित्यिकाला मुकलो आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, भारतीय प्रशासकीय सेवेतील कर्तव्यतत्पर अधिकारी म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ राज्याची सेवा केली. राज्याच्या पहिल्या महिला निवडणुक आयुक्त म्हणूनही त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारीपदाची जबाबदारी पार पाडत असताना साहित्यक्षेत्रातही त्यांनी स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. त्यांच्या निधनानं एक कुशल प्रशासक, उत्तम साहित्यिक, संवेदनशील व्यक्तिमत्वं आपण गमावलं आहे. त्यांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरण्याचं बळ त्यांच्या कुटुंबियांना मिळो, अशी प्रार्थनाही उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे.