आरोग्य सुविधा वाढविण्यावर तातडीने भर द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सोलापूर जिल्हा, पालिका प्रशासनाला निर्देश

मुंबई : सोलापूरमधील रुग्णांची झपाट्याने वाढती संख्या थोपवा, ‘चेस दि व्हायरस’ मोहीम प्रभावीपणे राबवून सोलापूर कोरोनामुक्त करा असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येणाऱ्या काळात विलगीकरण व इतर आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणावर वाढवा असे निर्देश दिले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे आज सोलापूर जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते. यावेळी मुख्य सचिव संजय कुमार. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांचीही उपस्थिती होती.

रोग आटोक्यात येतोय असा गाफिलपणा दाखवू नका असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई मध्ये ‘चेस दि व्हायरस’ मोहीम प्रभावीपणे राबविली गेली. इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येची घनता असूनही ही महामारी खूप पसरू दिलेली नाही. सोलापूरमध्ये विडी कामगार तसेच हातमाग, यंत्रमागातील कामगार मोठ्या संख्येने आहेत. त्यांच्या व्यवसायामुळे त्यांना आरोग्याच्या काही समस्या येत असतात, विशेषत: फुफुसे, श्वसनाशी सबंधित रोग मोठ्या प्रमाणावर आढळतो तसेच त्यांची रोग प्रतिकार शक्ती कमी झालेली असते. अशा वेळी कोरोनाचा प्रादुर्भाव त्यांना लवकर होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने अतिशय काटेकोर आणि जलद पावले उचलून घरोघर तपासणी आणि  चाचण्या वाढवाव्यात व सर्वात महत्त्वाचे  म्हणजे रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधून त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवावे. पुढील काळातही खासगी डॉक्टर्सची सेवा घेणे, विलगीकरण सुविधा वाढविणे, ६० वर्षांच्या पुढील सर्वांची ऑक्सिजन पातळी  तपासणे, त्यांना इतर कुठले आजार झाले आहेत ते पाहणे या बाबींना अधिक वेग द्यावा. कंटेन्मेंट झोन्सकडे अधिक लक्ष द्यावे असेही ते म्हणाले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले की सोलापूरमध्ये ३ जूननंतर म्हणजे लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर अचानक रुग्ण संख्येत वाढ होऊ लागली. गेल्या आठवड्यात एन्टीजेन चाचणीमुळे ९०० रुग्ण सापडले. सध्या रुग्ण बरे होण्याचा रिकव्हरी रेट ५५ टक्के असून २७०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात एकूण ३६९ मृत्यू  झाले असून मृत्यूदर कमी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरु आहेत. साडेदहा लाख लोकांचे सर्वेक्षण झाले असून सुमारे सव्वा लाख लोकांना एकापेक्षा अधिक रोग आहेत असे आढळले आहे. २७ हजार लोक कंटेन्मेंट क्षेत्रात आहेत. दिवसाला सरासरी २ हजार चाचण्या करीत असून त्या ३ हजार करण्याचे उद्दिष्ट आहे असेही ते म्हणाले. मनुष्यबळाची पूर्तता करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

पुणे विभागीय आयुक्त डॉ.  दीपक म्हैसेकर यांनी सांगितले की, विशेषत पालिकेच्या ६, ७, ८ प्रभागांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळत असून रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामीण भागात बार्शी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर या भागात लोकांचे इतरही जिल्ह्यातून येणे जाणे असल्याने रुग्णसंख्या वाढते आहे. विडी कामगारांच्या फुफुसे, डोळे, हाताना इजा होण्याचे प्रमाण खूप आहे. याठिकाणी ताडी, तंबाखू सेवनाचे प्रमाणही जास्त आहे. पालिका आयुक्त पी. सिवसंकर यांनी सांगितले की, सोलापूरमध्ये १३०० खासगी डॉक्टर्स असून यापूर्वीही ३३ डॉक्टर्सनी सेवा दिली आहे. १२ एप्रिल रोजी सोलापुरात १ रुग्ण आढळला होता. ४ ते ३ जून दरम्यान ४२ केसेस होत्या. ३ जून नंतर अचानक १५२१ केसेस झाल्या.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ,  पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक यांनी देखील उपाययोजनांची माहिती दिली.

मुख्य सचिव संजय कुमार यांनी कोरोनाशी लढताना जिल्हा प्रशासनाला ज्या काही कमतरता भासत असतील  त्याची पूर्तता राज्य सरकारकडून तातडीने करण्यात येईल असे सांगितले. अजोय मेहता यांनी अतिशय काटेकोरपणे कोरोना रुग्णांचा शोध , त्यांचे जास्तीत जास्त संपर्क तपासणे, ऑक्सिजन व्यवस्था, रुग्णांना दिली जाणारी सेवा यावर भर दिल्यास मृत्यूदर कमी होईल असे सांगितले.