नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएलचा तेरावा हंगाम युएईमध्ये खेळवला जाणार आहे. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी ESPNCricinfo शी बोलत असताना याबद्दल माहिती दिली. गव्हर्निंग काऊन्सिलच्या आगामी बैठकीत याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात येईल असं पटेल म्हणाले. स्पर्धेच्या तारखांबद्दल अद्याप पटेल यांनी कोणतीही माहिती दिली नसली तरीही याआधी प्रसारमाध्यमांत आलेल्या वृत्तानुसार २६ सप्टेंबर ते ७ नोव्हेंबर या काळात बीसीसीआय तेराव्या हंगामाचं आयोजन करण्याच्या तयारीत आहे.

“आयसीसी टी-२० विश्वचषकाचं आयोजन पुढे ढकललं जाईल याची वाट आम्ही पाहत होतो. आयसीसीने याबद्दलची घोषणा केल्यानंतर आम्ही भारत सरकारकडे परवानगी मागितली आहे. आम्हाला परवानगी मिळेल अशी आशा आहे”, पटेल यांनी माहिती दिली. दुबई, अबुधाबी आणि शारजाह या तीन मैदानांवर ही स्पर्धा खेळवली जाईल. या स्पर्धेला चाहत्यांना परवानगी असेल की नाही याबद्दल विचारलं असता तो निर्णय UAE मधील सरकारचा असल्याचं पटेल यांनी सांगितलं.

आयपीएल स्पर्धा आटोपल्यानंतर भारतीय खेळाडू तिकडून ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहेत. त्यांना पुढील दौऱ्यासाठी पुरेसा वेळ मिळावा व इतर आवश्यक नियमांचं पालन व्हावं यासाठी ७ नोव्हेंबरला स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार असल्याचं कळतंय.