नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पात्र स्थलांतरित मजूर कुठल्याही ठिकाणी असले तरी त्यांना वैद्यकीय लाभ घेता येतील, असं कामगार राज्य विमा महामंडळानं आज घोषित केलं. कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर कामगांराना वैद्यकीय लाभ मिळावेत याकरिता गेल्या महिन्यातच हा निर्णय झाल्याचं महामंडळाचे क्षेत्रिय संचालक प्रणय सिन्हा यांनी सांगितलं.

गेल्या वर्षी ३१ मार्च पर्य़ंत राज्यातल्या ४८ लाख ४७ हजार ९८० कामगारांना विमा कवच होतं तर महामंडळाकडे नोंदणीकृत कामगारांची संख्या १ लाख ७६ हजार ९३४ इतकी आहे. राज्यभरात महामंडळाची १५ रुग्णालयं असून ५५ दवाखाने आहेत. तर २६४ खाजगी रुग्णालयं महामंडळाशी संलग्न आहेत. आणखी २९ दवाखाने सुरु करण्याचं महामंडळानं ठरवलं असल्याचं सिन्हा यांनी सांगितलं. त्यामुळे आता पात्र स्थलांतरित मजूर जिथे कुठे असतील तिथे आरोग्यसुविधांचा लाभ घेऊ शकतात.