नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेला लॉकडाऊन केवळ‍ आर्थिक प्रश्र्न सोडवण्याकरता पूर्णपणे उठवला जाणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

या संसर्गामुळे निर्माण झालेली आव्हानं लक्षात घेता आरोग्य आणि अर्थव्यवस्थेमधे योग्य समतोल साधण्याची गरज असल्याचं त्यांनी एका मुलाखती दरम्यान नमुद केलं आहे.

टाळेबंदी पूर्णपणे उठवली जाणार नसली तरी आपण काही गोष्टी टप्याटप्यानं सुरू करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. एकदा व्यवहार सुरू झाल्यानंतर पुन्हा बंद करता येणार नसल्यानं आपण टप्प्यामधे उपाय योजत असल्याचं ते म्हणाले.

‘पुनश्च हरीओम’ म्हणत जून महिन्यापासून टाळेबंदी अंशतः उठवली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या सरकारनं सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण केला असल्याच्या पार्श्र्वभूमीवर एका प्रश्र्नाच्या उत्तरात मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, हे ‘ठाकरे सरकार’ नसून ‘सर्वांचं सरकार’ आहे.