मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत  पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना जोपर्यंत कोविड-१९ प्रादुर्भाव संपत नाही, तोपर्यंत त्यांची सेवा निवासस्थाने त्यांच्याकडे ठेवण्याची मुभा देण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

या निर्णयाचा लाभ बदली, सेवानिवृत्ती, वैद्यकीय अपात्रता झालेल्या, अधिकारी, कर्मचाऱ्यांना तसेच सेवेत असताना अकाली मृत्यू अशा प्रकरणांमध्ये संबंधित पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्या कुटुंबियांना होईल.

ज्या प्रकरणांमध्ये, तीन महिन्याची भाडेमाफ सवलत लॉकडाऊन अंमलात आल्यानंतर म्हणजे २३ मार्चनंतर संपली किंवा संपणार असेल, त्या प्रकरणांमध्ये अर्जदाराने विनंती केलेली तारीख किंवा कोरोना संसर्गातील निर्बंध असेपर्यंत  यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत सेवा निवासस्थाने ताब्यात ठेवण्यात मुदतवाढ देण्यात आली आहे.

तसेच ज्या प्रकरणांमध्ये सेवा निवासस्थान ताब्यात ठेवण्यास सक्षम प्राधिकारी यापूर्वी दिलेली मुदतवाढ ही लॉकडाऊन अंमलात आल्यानंतर म्हणजे 23 मार्च किंवा त्यानंतर संपली किंवा संपणार असेल त्या प्रकरणांमध्ये अर्जदाराने विनंती केलेली तारीख किंवा कोरोना  संसर्गातील निर्बंध असेपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत त्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

उपरोक्त दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधित पोलिस अधिकारी किंवा कर्मचारी यांना केवळ अनुज्ञप्ती शुल्क भरावे लागणार आहे.