मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सर्व शासकीय रूग्णालयांतल्या अवैध गर्भपातांची चौकशी आणि तपासणी करण्यासाठी राज्य सरकारनं माजी पोलिस महासंचालक अजित पारसनीस यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यीय समिती स्थापना केली आहे.

राज्यात ज्या ठिकाणी अवैध गर्भपाताची घटना घडली आहे त्यांची चौकशी करुन अहवाल सादर करणे, अशा घटनांसाठी कारणीभूत असलेल्या त्रुटी शोधणे तसंच त्यांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी करावयच्या उपायोजना या समितीला सुचवायच्या आहेत. घटना घडल्यापासून एक महिन्याच्या आत समितीला आपला अहवाल सादर करण बंधनकारक असणार आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागानं याबाबतचा शासन निर्णय आज जारी केला आहे. या समितीत माजी आरोग्य सेवा संचालक सुभाष साळुंखे, जे.जे. रूग्णालयाच्या स्त्री रोग विभाग प्रमुखांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. तर, आरोग्य सेवा विभागाचे सहाय्यक संचालक या समितीचे सदस्य सचिव असतील.