मुंबई (वृत्तसंस्था) : उपनगरीय रेल्वे सेवा येत्या १५ ऑक्टोबरपासून सर्वांसाठी खुली करण्यावर राज्य सरकार गांभीर्यानं विचार करत असल्याचं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज्याची अर्थव्यवस्था गाडी पुन्हा रुळावर यावी यासाठी शासन करत असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून उपनगरीय रेल्वे सेवा सर्वांसाठी खुली करण्यावर विचार होत असल्याचं पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटल्याचं ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रात प्रसिद्ध झालं आहे.

कोविड १९ चा फैलाव रोखण्यासाठी सध्य़ा ही रेल्वे सेवा, अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी, राज्य तसंच केंद्र सरकारचे कर्मचारी, राष्ट्रीय आणि खासगी बँकांचे कर्मचारी, औषध कंपन्यांमधले कामगार यांना क्यूआर कोडवर आधारित ओळखपत्रावर देण्यात येत आहे.

रस्त्यावरची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कार्यालयं आणि व्यावसायिक आस्थापन २४ तास सुरु ठेवण्यावर ही शासन विचार करत असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याबाबतही ही रेल्वे प्रशासनाशी चर्चा सुरु असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.