मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला स्वच्छता, सेवाकार्य तसेच वृक्षारोपणाच्या माध्यमातून महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्याचे आवाहन केले आहे.

यानिमित्ताने महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा व स्वावलंबन या त्रिसूत्रीचे स्मरण होते. महात्मा गांधींनी जीवनात स्वच्छता, गोरगरिबांची तसेच रुग्णांची सेवा व ग्रामविकासाला विशेष महत्व दिले होते. कोरोना संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत स्वच्छतेसोबतच निःस्वार्थ सेवाकार्याचे महत्त्व अधोरेखेत झाले आहे. यास्तव, महात्मा गांधी यांची 151 वी जयंती परिसर स्वच्छता कार्यक्रम, वृक्षारोपण तसेच गोरगरिबांची सेवा करून साजरी करावी असे आवाहन करतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे.