नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  मध्य रेल्वेवर सुरु झालेल्या देशातल्या पहिल्या किसान रेल्वेला आता चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या १० दिवसांमध्ये २५ फेऱ्यांच्या माध्यमातून ३ हजार ८९३ टन मालाची वाहतूक ही जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळ विभागातून झाली आहे. डाळिंब, सिमला मिरची, हिरवी मिरची, आलं, लिंबू, बर्फातले मासे यासारख्या नाशवंत मालाची वाहतूक वातानुकुलित डब्यामधून केली जाते. सध्या देवळाली, नाशिक, लासलगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, बुऱ्हाणपूर आणि खंडवा या ठिकाणांहून वाहतूक केली जात आहे.

सुरुवातीला देवळाली ते दानापूर या दरम्यान ही गाडी आठवड्यातून एकदा आणि त्यानंतर मुजफ्फरपूरपर्यंत सेवा विस्तारित झाल्यानंतर आठवड्यातून तिनदा चालवली जाते. शिवाय सांगोला आणि पुणे इथून मनमाडला लिंक रेल्वेद्वारे जोडली जात असून, याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.