सोलापूर : हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. संभाव्य संकटात एकही जीव गमावता कामा नये, काळजी करु नका, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अक्कलकोट तालुक्यातील सांगवी खुर्द येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागास भेट देऊन ग्रामस्थांसोबत संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर बोरी नदी व परिसरातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली.

यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषिमंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार विनायक राऊत, खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, प्रणिती शिंदे, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, विभागीय आयुक्त सौरभ राव, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते सांगवी खुर्द येथील  शेतकरी काशिनाथ शेरीकर यांना रु.95 हजार 100 रुपयांचा मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला.