नवी दिल्ली : ‘छोडो भारत’, ‘गोवा मुक्ती संग्राम’ आणि हैद्राबाद मुक्ती संग्रामात जीवाची बाजी लावून ब्रिटीश सत्तेविरोधात बंड पुकारणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागामुळेच भारत देशाला सुवर्ण दिवस प्राप्त झाले, असे गौरवोद्गगार केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रममंत्री अरविंद सावंत यांनी काढले.

क्रांतीदिनी महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री श्री. सावंत यांनी आज महाराष्ट्र सदनात या स्वातंत्र्यसैनिकांची सदिच्छा भेट घेतली व त्यांचा सत्कार केला.   त्यांच्यासोबत अनौपचारिक गप्पाही मारल्या. यावेळी श्री. सावंत यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिकांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. छोडो भारत, गोवा मुक्ती संग्राम आणि हैद्राबाद मुक्ती संग्रामात दिलेल्या योगदानाबाबत या स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या योगदानाबाबत त्यांच्याच शब्दात जाणून घेतले. मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदार संघाचे खासदार राहुल शेवाळे, अचलपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार बच्चू कडू, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यावेळी उपस्थित होते.

भारत देश पारतंत्र्यात असताना ब्रिटीश सत्तेविरोधात बंड पुकारणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याच्या भावना श्री. सावंत  यांनी व्यक्त केल्या. जीवाची बाजी लावून ब्रिटीशांविरोधात बंड पुकारणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागामुळेच भारत देशाला सुवर्ण दिवस प्राप्त झाले असेही श्री. सावंत म्हणाले. यावेळी महाराष्ट्र सदनाच्या लॉबीमध्ये स्वातंत्र्य सैनिकांचा आशीर्वाद घेतल्यानंतर श्री. सावंत यांनी ‘भारत माता की जय’ असा जयघोष केला त्यामुळे देशभक्तीमय वातावरण झाले.

यावेळी भंडारा जिल्ह्यातील भिवाजी अंबुले, नागपूर जिल्ह्यातील रतनचंद जैन,परभणी जिल्ह्यातील माधवराव कुलकर्णी, औरंगाबाद जिल्ह्यातील लक्ष्मण उखडे, लातूर जिल्हातील शिवलिंगप्पा इराप्पा उर्फ वीरभद्रप्पा सिद्रामप्पा मंडगे,वर्धा जिल्ह्यातील गणेश बाजपेयी आणि बीड जिल्ह्यातील बन्सी जाधव या स्वातंत्र सैनिकांचा सत्कार श्री. सावंत यांनी केला.