वृक्ष लागवडीत मागे राहिलेल्या जिल्ह्यांनी वृक्षलागवडीस वेग द्यावा – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई : राज्यात आजपर्यंत ३१ कोटी २० लाख ०७ हजार ७३७ वृक्षलागवड झाली असून ही ३३ कोटी संकल्पाच्या ९०.६५ टक्के इतकी आहे. आतापर्यंत झालेल्या वृक्षलागवडीत ८९ लाख ११ हजार ३६३ वृक्षस्नेही  सहभागी झाले आहेत अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. संकल्पाच्या पूर्ततेमध्ये जे जिल्हे थोडे मागे पडले आहेत, त्यांनी वृक्षलागवडीच्या कामाला गती द्यावी असेही आवाहन श्री. मुनगंटीवार यांनी केले आहे.

एक कोटी पेक्षा अधिक वृक्षलागवड झालेले जिल्हे

राज्यात सर्वाधिक वृक्षलागवड नाशिक जिल्ह्यात झाली असून येथे १ कोटी ९८ लाख २८ हजार ०९५ रोपे लावली गेली आहेत. उद्दिष्टाच्या १०१.०१ टक्के वृक्षलागवड जिल्ह्यात झाली असून आतापर्यंत ६ लाख ५४ हजार ६२३ नागरिकांनी यात सहभाग घेतला आहे.

दुसऱ्या क्रमांकावर नांदेड जिल्हा आहे. येथे १ कोटी ६६ लाख ३६ हजार २६८ वृक्ष लावले गेले यात ६ लाख ६४ हजार ७३९ नागरिकांनी सहभाग नोंदवला. जिल्ह्यात उद्दिष्टाच्या १०३.५२ टक्के वृक्षलागवड झाली आहे.

तिसऱ्या क्रमांकावर चंद्रपूर जिल्हा असून येथे १ कोटी ६४ लाख ८२ हजार ४३३ वृक्ष लागले. यात १ लाख ८९ हजार ८९४ लोकांनी सहभाग नोंदवला. उद्दिष्टाच्या ९६.२८ टक्के वृक्षलागवड जिल्ह्यात झाली आहे.

चौथ्या क्रमांकावर पुणे जिल्हा असून येथे १ कोटी २८ लाख ६६ हजार २५३ वृक्ष लागले. यात २ लाख ४८ हजार ७८८ लोक सहभागी झाली. जिल्ह्यातील वृक्षलागवड उद्दिष्टाच्या ८४.४४ टक्के आहे.       पाचव्या क्रमांकावर यवतमाळ जिल्हा असून येथे १ लाख ८७ हजार ८२४ लोकांच्या सहभागातून १ कोटी १६ लाख ५३ हजार ६९२ वृक्ष लागले. जिल्ह्यातील वृक्षलागवड ८४ टक्के आहे

सहाव्या क्रमांकावर बीड जिल्हा आहे. येथे ३ लाख ७६ हजार ४३३ लोकांच्या सहभागातून १ कोटी १३ लाख ८० हजार ४६४ रोपे लावली गेली.  उद्दिष्टाच्या ९३.४६ टक्के रोप लागवड जिल्ह्यात झाली आहे.

सातव्या क्रमांकावर औरंगाबाद जिल्हा आहे. येथे ५ लाख ६४४ लोकांच्या सहभागातून १ कोटी १३ लाख ६४ हजार १५२ रोपे लावली गेली आहेत.  जिल्ह्यातील वृक्षलागवडीची टक्केवारी १०२.०३ टक्के आहे.

आठव्या क्रमांकावर अहमदनगर जिल्हा असून येथे ४ लाख २० हजार ०९९  लोकांच्या सहभागातून १ कोटी १३ लाख ११ हजार ७७४ वृक्षलागवड झाली आहे. ही टक्केवारी ९६.१६ टक्के आहे.

नवव्या क्रमांकावर जळगांव जिल्हा असून येथे २ लाख ८४ हजार ६०४ लोकांच्या सहभागातून १ कोटी ११ लाख ८८ हजार ८११ वृक्ष लागले.  ही वृक्षलागवड ९७.२७ टक्के आहे.

दहाव्या क्रमांकावर कोल्हापूर जिल्हा आहे. येथे ३ लाख ८६ हजार ०१५ लोकांच्या सहभागातून १ कोटी ११ लाख ०३ हजार ४८७ वृक्षलागवड झाली . ही वृक्ष लागवड उद्दिष्टाच्या ९८.०६ टक्के आहे.

एक कोटी  किंवा त्यापेक्षा अधिक वृक्षलागवड केलेल्या जिल्ह्यांमध्ये गडचिरोली, अमरावती, सातारा आणि जालना या जिल्ह्यांचा समोवश आहे.

कमी वृक्ष लागवड झालेल्या जिल्ह्यांमध्ये  सोलापूर (६०.३३%), मुंबई शहर (60.43%), परभणी(62.83%), लातूर(71.48%), वर्धा(74.62%), रायगड (७९.४४ %)   या जिल्ह्यांचा समावेश आहे.

राज्यात जुलै ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत लोकसहभागातून ३३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प करण्यात आला आहे संकल्पाच्या पूर्ततेमध्ये जे जिल्हे थोडे मागे पडले आहेत त्यांनी वृक्षलागवडीच्या कामाला गती द्यावी असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. आतापर्यंत राज्यात तीन वर्षात ५० कोटी वृक्षलागवडीच्या महामहोत्सवात राज्यातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि वृक्ष लागवड ही खऱ्या अर्थाने लोकचळवळ झाल्याचेही वनमंत्र्यांनी सांगितले.