नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मागणीसाठी बेळगाव आणि सीमाभागात १ नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून पाळला जातो. सीमाभागातल्या नागरिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी राज्यातलं महाविकास आघाडी सरकारचं मंत्रिमंडळ आज काळ्या फिती बांधून काम करत आहे.

  बेळगाव, कारवार, निपाणीसह ‘संयुक्त महाराष्ट्र’ हा आपला निर्धार असून सीमाभागातील मराठी बांधवांच्या लढ्याला राज्यातल्या प्रत्येकाचा सक्रिय पाठिंबा आहे, असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपला पाठिंबा जाहीर केला.

  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आपल्या हाताला काळी फित बांधून काम सुरु केलं. राज्यातली जनता ही सीमा भागात अडकलेल्या मराठी भाषिक बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.

अजूनही कर्नाटक सरकार कडून सीमा भागातल्या मराठी भाषिकांवर अन्याय होत असून, त्याच्या निषेध म्हणून हाताला काळी फीत लावल्याचं पाटील यांनी सांगितलं.