नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु झाली असल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी नवी दिल्ली येथे वार्ताहर परिषदेत दिली. देशभरातल्या शेतकऱ्यांनी निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

लहान आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले. या योजनेसाठी विविध राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. केंद्रीय कृषी सचिव संजय अगरवाल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यांना याची माहिती दिली आहे.

ही योजना ऐच्छिक असून 18 ते 40 या वयोगटातले शेतकरी तिचे सदस्य बनू शकतात. महिन्याला 55 ते 200 रुपये हप्ता भरल्यावर त्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर महिन्याला 3000 रुपयांचे निवृत्ती वेतन मिळणार आहे अशी माहिती तोमर यांनी दिली.