मुंबई (वृत्तसंस्था) : मिठी नदी पात्रातल्या क्रांती नगर, संदेश नगर इथल्या बाधित झोपडपट्टीधारकांना प्राधान्य देऊन त्यांचे त्वरित स्थलांतर करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

ते काल विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरच्या झोपडपट्ट्यांचे स्थलांतर करण्याबाबतत्यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित बैठकीत बोलत होते. १९९५ च्या कायद्यानुसार जे झोपडपट्टीधारक अपात्र होते त्यांना नियमानुसार २०११ च्या शासन निर्णयाप्रमाणे पात्र करून घेण्याची कार्यवाही करावी. झोपडपट्टीधारकांना स्थलांतरित करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम तयार करून तिथल्या कामांना गती द्यावी, असे त्यांनी सांगितले.

कुर्ल्यातले बांधकाम मोकळ्या जागेत असून त्या ठिकाणी १७ हजार २०० घरे आहेत. यापैकी काही घरे मोडकळीला आलेली किंवा जीर्ण झाली आहेत. तसेच मीठी नदी पात्रात काही घरे आहेत त्यांना इतर ठिकाणी घरे बांधून द्यावीत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.