नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत बदल होणं अत्यंत महत्त्वाचं असून, याबाबतीत स्थायी सदस्यत्वाकरता भारताला ब्रिक्स देशांचा पाठिंबा अपेक्षित असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. १२ व्या ब्रिक्स परिषदेत काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होताना ते बोलत  होते.  अनेक आंतरराष्ट्रीय संस्था बदलत्या काळानुसार काम करत नाहीत, जागतिक आरोग्य संघटना, जागतिक व्यापार संघटना, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यासारख्या  संस्थामध्ये सुधारणा होणे आवश्यक आहे, असं मत मोदी यांनी व्यक्त केलं.

रशियाच्या नेतृत्वाखाली दहशतवादाशी लढण्यासाठी ब्रिक्स देशांचे धोरण तयार करण्यात येत असून, ते अंतिम टप्प्यात आलं आहे, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. पुढच्या वर्षी ब्रिक्सचं नेतृत्व भारताकडे येणार आहे ,तेव्हा भारत हे धोरण पुढे नेईल अशी ग्वाही त्यांनी दिली.

औषध निर्मिती क्षेत्रात भारत सामर्थ्यवान असल्यानं कोविड १९ च्या साथीदरम्यान, १५० पेक्षा अधिक देशांना भारत औषध पुरवठा करू शकला. कोविड १९ ची लस निर्मिती आणि पुरवठा या बाबतही भारत सक्षम असल्यानं मानवजातीला मदत करू शकेल, असंही मोदी म्हणाले.