मुंबई (वृत्तसंस्था) : नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या जल्लोषामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी यासाठी मुंबईमध्ये ३५ हजारापेक्षा जास्त पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.

COVID-१९ बाबतच्या नियमांची कडक अंमलबजावणी तसंच अनावश्यक घटना रोखणं हा यामागचा उद्देश असल्याचं पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आज सांगितलं.

रात्रीच्या संचारबंदी बाबतच्या नियमांनुसार हॉटेल, रेस्टोरेंट आणि पब रात्री अकरा नंतर बंद राहतील, तसंच पाच पेक्षा जास्त नागरिकांनी एकत्र येण्यावर बंदी राहील असं ते म्हणाले.

या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.