मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यात स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी होत आहे. त्यानिमित्त राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रम होत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

स्वामी विवेकानंद हे भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे विश्र्वदूत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. आचार, विचार, व्यवहार याबाबत त्यांनी सहज सोप्या भाषेत आणि तितक्याच स्पष्टपणे विचार मांडले आहेत. हे विचार आजच्या युवा पिढीसह येणाऱ्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरतील असंही ते म्हणाले.

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनाच्याही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज बोरिवलीच्या स्वामी विवेकानंद मार्गावरच्या गोरा गांधी इथल्या त्यांच्या पूर्णाकृती पुतळयाला आमदार सुनिल राणे आणि आमदार मनिषा चौधरी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

यावेळी भाजप उत्तर मुंबई अध्यक्ष गणेश खणकर, नगरसेवक जितेंद्र पटेल, हरीश छेडा, प्रविण शहा तसंच बिना दोशी यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. उस्मानाबाद इथं स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता युवा मोर्चानं कोरना संक्रमण  काळात सामाजिक कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांचा सन्मान केला.

जनकल्याण समिती, मतिमंद मुलींची शाळा चालवणारे शहाजी चव्हाण, अन्नपूर्णा ग्रुप, एकता फाउंडेशन तसंच अन्य सामाजिक संस्थां आणि  व्यक्तिंचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भारतीय जनता युवा मोर्चा प्रभारी अरुण पाठक, जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर उपस्थित होते.धुळे शहरात आज स्वामी विवेकानंद यांची जयंती तसंच राष्ट्रीय युवक दिनानिमित्त मोहाडी पोलीस चौकी परीसरात आंबा, लिब, अंजन, चिंच अशा रोपांचं वृक्षारोपण पोलीस अधिक्षक चिन्मय पंडित यांच्या हस्ते झालं.

परभणीत स्वामी विवेकानंद जयंती तसंच राष्ट्रीय युवा दिनानिमित्त होमिओपॅथिक अकॅडमी, रिसर्च ॲड चॅरिटीज या संस्थेनं सुरू केलेल्या अभ्यासिकेचे उद्घाटन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या हस्ते झालं. यावेळी आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना फीसाठी धनादेश, सायकल यांचं वाटप झालं.