नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लड्डाखमध्ये गलवान खोऱ्यात काल रात्री चिनी सैन्याबरोबर झालेल्या संघर्षामध्ये भारतीय लष्कराचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले. या भागातून दोन्ही देशांचं सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरु असताना हा संघर्ष झाल्याचं लष्कराच्या निवेदनात म्हटलं आहे.

चीनबरोबरच्या या सीमावर्ती भागातला तणाव कमी करण्याच्या दृष्टीनं  दोन्ही देशांच्या वरिष्ठ पातळीवरच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये सध्या बोलणी सुरु असून, कालच्या  संघर्षात चिनी लष्कराचे सैनिक देखील मारले गेल्याचं या निवेदनात म्हटलं आहे.

दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज नवी दिल्ली इथं  परराष्ट्र मंत्री जयशंकर, संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत आणि तिन्ही सेना दल प्रमुखांची बैठक घेऊन या घटनेचा आढावा घेतला.