मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या ३४ जिल्ह्यातल्या १४ हजार २३४ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सर्वत्र कोरोना नियमांचं पालन करत शांततेत मतदान सुरू आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात ३८२ ग्रामपंचायतीसाठी आज दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ६६ टक्के मतदान झालं आहे. तर वाशिम जिल्ह्यात ६१ पूर्णांक ३९ टक्के मतदान झालं. रत्नागिरी जिल्ह्यात ६० टक्के मतदान झालं. नंदूरबार जिल्ह्यात ६६ पूर्णांक ४९ टक्के मतदान झालं. हिंगोली जिल्ह्यात ६० पूर्णांक ८१ टक्के मतदान झालं. रायगड जिल्ह्यात ६८ पूर्णांक ७५ टक्के मतदान झालं.

भंडारा जिल्ह्यात दुपारी दीड वाजेपर्यंत ५१ पूर्णांक १० टक्के मतदान झालं. धुळे जिल्ह्यात ४८ पूर्णांक ९६ टक्के मतदान झालं.

ठाणे जिल्ह्यात ७१ पूर्णांक २८ टक्के मतदान झालं.

सांगली जिल्ह्यात ग्राम पंचायत निवडणुकी साठी काही ठिकाणी वादावादी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. जिल्ह्यात दुपारी तीन वाजेपर्यंत सुमारे ४० टक्के मतदान झाल्याचा अंदाज निवडणूक विभागातल्या  अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

जालना जिल्ह्यातल्या ४४६ ग्रामपंचायतींसाठी  सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान झाले. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सात लाख २० हजार ७५ मतदारांपैकी चार लाख ४३ हजार ३९३ मतदारांनी मतदनाचा हक्क बजावला. मतदनाची टक्केवारी ६१ पूर्णांक ५८ टक्के इतकी होती. दरम्यान, भोकरदन तालुक्यातल्या कोठा दाभाडी इथल्या प्रभाकर दादाराव शेजूळ या उमेदवाराचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला.

यवतमाळच्या अर्जुना इथं मतदान केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड झाला. त्यामुळे मतदारांना खोळबूंन रहावं लागलं. या केंद्रावर दुपारपर्यंत 50 टक्के मतदान झालं.