नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सेना दिनानिमित्त सर्व देशवासीयांच्या वतीनं भारतीय लष्कराला वंदन केलं आहे. लेफ्टनंट जनरल करिअप्पा यांनी १५ जानेवारी १९४९ रोजी भारताचे लष्करप्रमुख म्हणून सूत्र स्वीकारली होती, या घटनेच्या स्मृती प्रित्यर्थ सेना दिवस साजरा केला जातो.

लष्करानं साहस, दृढसंकल्प आणि कणखर राहून कायम अभिमानास्पद कामगिरी  केली आहे, अश्या शब्दात मोदी यांनी भारतीय लष्कराचा गौरव केला.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी, लष्करातल्या वीर जवानाचं बलिदान देश कधीही विसरू शकणार नाही या शब्दात आपल्या आदर भावना व्यक्त केल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे की, सदैव सज्ज, सावध आणि सतर्क जिगरबाज जवान आणि लष्करातल्या माझ्या बांधवांना मानाचा मुजरा! तुम्ही आहात, म्हणून आम्ही इकडे निश्चिंत आहोत. भारतमातेच्या रक्षणासाठी हौतात्म्य पत्करलेल्या शूरवीरांना कोटी कोटी प्रणाम.