नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायद्यांबद्दल शेतकऱ्यांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून, सरकार प्रत्येक आंदोलनाचा आदर करते, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं सुरु झालं, त्यावेळी ते बोलत होते. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याची घटना दुर्दैवी असून, जे संविधान आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देतं, त्याच संविधानानुसार आपल्याला कायदा आणि नियमांचं गंभीरपणे पालन केलं पाहिजे, असं राष्ट्रपती म्हणाले.

या कृषी सुधारणा कायद्यांच्या माध्यमातून सरकारने शेतकऱ्यांना नवीन सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच अधिकारही दिले आहेत, कृषी क्षेत्राला अधिक लाभ देण्यासाठी सरकार कृषी क्षेत्रात आधुनिक पायाभूत सुविधांवर काम करत आहे, असं राष्ट्रपतींनी अभिभाषणातून स्पष्ट केलं. कोविड काळात सरकारकडून करण्यात आलेली मदत, कृषी कायद्यांना दिलेली मंजुरी, आत्मनिर्भर भारत, विविध योजना त्यांचे फायदे, यावर राष्ट्रपतींनी भाष्य केलं.

भारतानं कोरोना महामारीचा एकजुटीनं सामना केला असून, लस निर्मितीतही भारत पुढे असल्याचं त्यांनी नमूद केलं. सरकारनं योग्य वेळी घेतलेल्या निर्णयांमुळे लाखो लोकांचे प्राण वाचले, असं राष्ट्रपती म्हणाले.