मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये आजपासून महाविद्यालयं सुरू झाली. गेल्या ९-१० महिन्यांपासून बंद असलेली महाविद्यालयं शासनाच्या आदेशानुसार आजपासून नियमांचे पालन करीत सुरु झाली आहेत.

राज्य सरकारनं आजपासून ५० टक्के क्षमतेसह महाविद्यालयं सुरू करण्याची परवानगी दिली आहे. सर्व महाविद्यालयांमध्ये कोविड १९ च्या दिशादर्शक सूचनांच पालन करणं अनिवार्य करण्यात आलं आहे.

अहमदनगर जिल्ह्यात सर्वत्र महाविद्यालये सुरु झाल्याने ओस पडलेला परिसर आज पुन्हा गजबजून गेला आहे. पुण्यात पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी  महाविद्यालयांत काही  प्रमाणात हजेरी लावली,  तर काही महाविद्यालयांनी केवळ प्रॅक्टिकल वर्ग सुरु करायला प्राधान्य दिलं आहे. तर अनेक महाविद्यालयांनी; सूचना मिळेपर्यंत महाविद्यालयात येऊ नये अशा सूचना विद्यार्थ्यांना दिल्या आहेत

मुंबईतली महाविद्यालयं मात्र आजपासून सुरु होणार नाहीत. चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना ७५ टक्के उपस्थितीच्या नियमात सवलत देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.