नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित, पुण्यासह जम्मू, इंफाळ, पटणा, भुवनेश्वर, आणि बंगळूरु इथं आयोजित केलेल्या विशेष प्रदर्शनाचं आज केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केलं.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना लोकांना एकमेकांशी जोडणं आणि स्वतंत्र्य संग्रामाबद्दल जनतेला महिती देणं हा प्रधानमंत्र्यांचा मुख्य उद्देश असल्याचं जावडेकर यावेळी म्हणाले.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांच्या सह अनेक अधिकारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.मुंबईतल्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहातही काल भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रम झाला

. राज्यपाल भगतसिहं कोश्यारी आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख या कार्यक्रमात सहभागी झाले होते. ‘आजादी का अमृत महोत्सव’ हा देशवासियांच्या मनांना जोडणारा उपक्रम असून या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असं आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलं.भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेक महापुरूषांनी बलिदान दिलं आहे.

यात महाराष्ट्रातल्या महापुरूषांचंही योगदान असल्याचं ते म्हणाले. हा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात महाराष्ट्राला अव्वल आणू, असा विश्वास सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केला आहे. अशा उपक्रमांसाठी निधीची कमतरता येणार नाही, अशी ग्वाही देशमुख यांनी यावेळी दिली.

हा उपक्रम साजरा करताना कोरोना महामारीसंबंधी मार्गदर्शक सूचनांची काळजी घेण्याचं आवाहनही देशमुख यांनी केलं. दरम्यान, काल नागपुरातही आजादी का अमृतमहोत्सव या कार्यक्रमाचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रारंभ झाला. दांडी यात्रा दिनाचं औचित्य साधून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.