मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात दररोज ३ लाख लोकांचं लसीकरण करायचं नियोजन करावं असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. ते काल राज्यभरातल्या विभागीय आयुक्तांसोबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते. राज्यात दैनंदिन रुग्णसंख्या वाढत असली, तरी लसीकरणाला वेग देणं हे खरं आव्हान असल्याचं ते म्हणाले. प्राधान्यक्रम निश्चित केलेल्याचं लसीकरण येत्या तीन ते चार महिन्यात पूर्ण व्हायला हवं, असे निर्देशही त्यांनी दिले. उन्हाळ्याचे दिवस पाहता लसीकरण केंद्रांवर नागरिकांना सर्व सुविधा मिळतील याची सुनिश्चिती करावी, असं त्यांनी सांगितलं. वैद्यकीय तज्ञांनी कोरोनाच्या बदलत्या लक्षणांची नोंद करावी आणि त्यानुसार उपचाराकरता मार्गदर्शक तत्व जारी करावीत असंही ठाकरे यांनी या बैठकीत सुचवलं.