मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई पोलीस दल जगातलं उत्कृष्ट पोलीस दल असलं, तर सचिन वाझे प्रकरणामुळे मुंबई पोलिसांच्या प्रतिमेला धक्का लागल्याचं केंद्रीय मंत्री आणि भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आयुक्तांची बदली करायचा घेतलेला निर्णय योग्य असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. मात्र केवळ इतक्यावरच न थांबता वाझे यांच्यामागचा खरा सूत्रधार कोण आहे याचाही शोध घ्यायला हवा, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं ठेवण्याचं षडयंत्र कुणी रचलं हे कळायला हवं अशी मागणीही त्यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला वाझे यांचा बचाव केला, त्यांची ही भूमिका अत्यंत चूकीची होती अशी टिकाही त्यांनी केली.