मुंबई : मुलांची क्षमता वाढविण्यासाठी त्यांचे उत्तम संगोपन व त्यांच्यावर चांगले संस्कार करण्याची जबाबदारी आपली आहे आणि कथाकथन हे मुलांची सकारात्मक वाढ आणि विकासाचे एक महत्त्वपूर्ण अंग आहे. शिक्षण विभाग याला प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध असून महाराष्ट्रातील शाळकरी मुलांमध्ये उत्साही वाचन संस्कृती निर्माण करणे याला सर्वोच्च प्राधान्यक्रम देण्यात येत आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले.

जागतिक कथाकथन दिवसाचे औचित्य साधून आयोजित ‘गोष्टींचा शनिवार’ या कथा वाचनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) एकात्मिक बाल विकास सेवा (आयसीडीएस) युनिसेफ आणि प्रथम बुक्स  स्टोरी वेव्हर यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन परिसंवादाच्या माध्यमातून हा उपक्रम आयोजित केला.

महाराष्ट्रातील मुलांकरिता शाळाबंदीच्या कालावधीत विस्तार झाल्यामुळे मुलांच्या मानसिक आणि भावनिक विकासासाठी तसेच त्यांच्या भाषा कौशल्यात सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनाने पूरक असा ‘गोष्टींचा शनिवार’ हा उपक्रम गेल्या पाच महिन्यांपासून सुरु आहे.

या कार्यक्रमात 2.6 लाख शिक्षक आणि अंगणवाडी सेवक, राज्यभरातील एक लाख शाळा आणि अंगणवाड्यांनी सहभाग घेतला. याचा राज्यातील 25 लाख मुलांनी लाभ घेतला. ‘आनंद आणि भाषा कौशल्यासाठी वाचन’ या विषयावर पॅनल चर्चेचेही आयोजन करण्यात आले.

‘गोष्टींचा शनिवार’  हा कार्यक्रम ऑक्टोबर 2020 मध्ये सुरू करण्यात आला. या अंतर्गत पाच महिन्यांसाठी उच्च दर्जाची कथा पुस्तके, पहिली ते आठवीपर्यंतच्या राज्यातील विद्यार्थ्यांना मोफत देण्यात आली. प्रत्येक शनिवारी मराठी मधील एक कथा पुस्तक अंगणवाडीच्या मुलांना देण्यात येत असे. मुलांच्या वयोमानानुसार योग्य अशा चार पुस्तकांचे संच मराठी, उर्दू आणि इंग्रजी भाषेमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांबरोबर सामायिक करण्यात येत असे. ही ई-पुस्तके स्टोरी वेव्हर समूहाने तयार केली आणि त्याचेच व्हाट्सअप द्वारे ‘स्तरीय’ (Tier dissemination) वितरण परिमाणानुसार ही पुस्तके अधिकारी, शिक्षक, पालक आणि स्वयंसेवकांना मोफत वितरीत करण्यात आली आणि त्यानंतर ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमाने ही पुस्तके विद्यार्थ्यांसोबत सामायिक केली.
मुलांना या पुस्तकांत जास्त वेळ गुंतवून ठेवण्यासाठी व या पुस्तकांसोबत वेळ घालवायला लावण्यासाठी कथेच्या संकल्पनांवर आधारित मनोरंजक अशा गोष्टींद्वारे कथा पुस्तकांना प्राधान्य देण्यात आले. ही पुस्तके सार्वजनिक परवानाकृत असल्याने त्यांचे वाचन करणे, डाऊनलोड करणे, मुद्रित करणे, इतर स्वरूपात रूपांतरित करण्याची मुभा होती.

या निर्णयामुळे ही पुस्तके चित्रवाणी आणि इतर पडद्यांवर तसेच त्याचे प्रिंट काढून वितरण करणे आणि गडचिरोलीच्या सायकल वाचनालयासारख्या शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचवणे शक्य झाले. ज्या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाच्या अभावामुळे  ही पुस्तके इंटरनेट किंवा स्मार्टफोनच्या माध्यमाने पोहोचू शकत नव्हती, त्या ठिकाणी प्रथम बुक्सच्या माध्यमाने मिस कॉल द्या आणि गोष्टी ऐका यांसारखे उपक्रम चालविले गेले.

युनिसेफचे शिक्षण प्रमुख टेरी डूरनियान यांच्या मते – “ज्या ठिकाणी वाचन संस्कृतीला प्रोत्साहन द्यायचे आहे, अशा शाळेपूर्व व शाळेतील विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी पूरक वातावरण निर्माण करण्याच्या कामाला एनएपी 2020 चा एक अंग असलेले ‘फाउंडेशन लिटरसी’ द्वारे प्राधान्यक्रम दिले जात आहे. राज्याला पूर्णपणे मदत करण्यासाठी युनिसेफ कटिबद्ध असून हा कार्यक्रम चालू ठेवण्यासाठी आणि या अभियानांतर्गत मुलांना रोचक अशी पुस्तके फक्त शनिवारीच नव्हे, तर आठवड्याच्या प्रत्येक दिवशी शाळेत किंवा घरात उपलब्ध करून देण्यासाठीही  प्रयत्न सुरु राहतील. जर विद्यार्थ्यांमध्ये वाचन कौशल्य विकसित झाले तर ते स्वतः आयुष्यभर शिकत राहतात”
प्रथम बुक्सच्या अध्यक्षा सुजेन सिंग म्हणाल्या, “विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत वाचन कौशल्य आणि भावनिक आरोग्यास प्रोत्साहन देण्यासाठी कथा पुस्तके महत्त्वपूर्ण ठरतात. आमच्या वाचन कार्यक्रमांतर्गत आम्ही विविध विषयांवर असलेल्या ग्रेड-योग्‍य संकल्पना मुलांना देऊ इच्छितो. आम्ही एससीईआरटी, आय सी डी एस आणि शिक्षण क्षेत्रातले तज्‍ज्ञ आणि स्वयंसेवक यांचे आभारी आहोत की त्यांनी उत्तम नेटवर्क उपलब्ध करून दिला आणि सदर पुस्तकांच्या प्रसारासाठी खूप मदत केली. यामुळे अशा आव्हानात्मक वेळी ही पुस्तके मुलांपर्यंत पोहोचवणे शक्य झाले.