मुंबई : टीमवर्क आणि योजनेबद्दलच्या आपलेपणातून समृद्ध गावांची निर्मिती करणे शक्य आहे. पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेच्या माध्यमातून पर्यावरण आणि आर्थिक समृद्धीच्या वाटेवर मार्गस्थ झालेल्या गावांचे, गावकऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले. तसेच शासन या सर्व कामात त्यांच्यासोबत असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

22 मार्चच्या जागतिक जलदिनाचे औचित्य साधून पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेचा (पहिला टप्पा) गौरव सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. कार्यक्रमात कृषिमंत्री दादाजी भुसे, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, मुख्य सचिव सीताराम कुंटे याशिवाय पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमीर खान, श्रीमती किरण राव, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ आणि प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ, समृद्ध गाव योजनेतील गौरवाला पात्र ठरलेल्या गावातील नागरिक, राज्याच्या १८ जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले होते.

जलक्रांतीतून हरितक्रांती येणार आहे आणि हरितक्रांतीतून सुबत्ता. पण हे कुणा एकाचे काम नाही तर ते सर्वांनी एकत्र येऊन करावयाचे काम आहे असे सांगून मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले,  पडणाऱ्या पावसाच्या पाण्याची शास्त्रशुद्ध साठवणूक, पाणी वापर, पाणी नियोजन, पिक पद्धती, पौष्टिक गवताची निर्मिती अशा सर्व महत्त्वाच्या विषयांचा संस्कार आणि शिक्षण देण्याचे काम पाणी फाउंडेशनने केले. यातली प्रयोगशीलता समजून सांगितली. पाण्याचा जमिनीखालचा सातबारा कसा मोजायचा हे समजावून सांगितले. शिक्षणाबरोबर संस्कार महत्त्वाचा असतो. पाणी नियोजनाचा हा संस्कार गावाला आणि महाराष्ट्राला समृद्ध करणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्मिती केली. वसंत कानेटकरांनी म्हटल्याप्रमाणे पुन्हा एकदा गवताला भाले फुटण्याची गरज आहे. यातूनच  अडचणींवर मात करत समृद्ध आणि पाणीदार गावांच्या निर्मितीसाठीची जिद्द आपल्याला मिळेल.

पावसाचे वाहून जाणारे पाणी  धरणे, कालवे या माध्यमातून साठवताना त्याचा नियोजनबद्ध वापर होणे गरजेचे असते. यासाठी माथ्यापासून पायथ्यापर्यंतच नाही तर मुळापर्यंत जाऊन काम करण्याची तयारी ठेवावी लागते. तीच तयारी पाणी फाउंडेशनने केली, गावकऱ्यांना सोबत घेऊन, सोप्या साध्या भाषेत त्यांच्यापर्यंत यासंबंधीचे ज्ञान पोहोचवून त्यांनी काम केल्याचे प्रशंसोद्गारही मुख्यमंत्र्यांनी काढले.

दक्षता समित्यांनी गावांची काळजी घ्यावी

कोरोनाने पुन्हा खूप मोठ्या प्रमाणात डोके वर काढले असल्याने गावागावात स्थापन करण्यात आलेल्या दक्षता समित्यांनी शारीरिक अंतर पाळणे, मास्क लावणे, स्वच्छता राखणे यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींवर काम करावे, गावात कुणी विनामास्क फिरत असेल तर त्याला मास्क लावण्याची, त्रिसूत्रीचे पालन करायला लावण्याची शिस्त लावावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

कृषी विभागाच्या योजनांनाही बळ देणार – कृषिमंत्री

कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी शास्त्रशुद्ध नियोजनामुळे समृद्ध गाव स्पर्धा यशस्वी होईल असे म्हटले तसेच देशातील शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा, शेतकरी चिंतामुक्त व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात ‘विकेल ते पिकेल’ योजनेची अंमलबजावणी केली जात असल्याचे सांगितले. समृद्ध गाव योजनेत सहभागी गावांमध्ये कृषी विभागाच्या योजनांना बळ देऊन आपण गावांच्या विकासासाठी एकत्रित काम करू असेही श्री.भुसे म्हणाले. त्यांनी कृषी विभागाच्या काही महत्वाकांक्षी योजनांचीही यावेळी माहिती दिली.

पाणी क्षेत्रात प्रचंड काम करण्याची गरज – श्री. गडाख

जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख म्हणाले, ६० टक्के महाराष्ट्र जिरायती असून तिथे पाणलोटाची कामे केल्याशिवाय पर्याय नसल्याने पाणी फाउंडेशनचे काम खूप महत्त्वाचे आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. शेतीचा ऱ्हास थांबवण्यासाठी पाणी क्षेत्रात प्रचंड काम करण्याची गरज असून त्या दिशेने  काम सुरु झाले आहे.

कार्यक्रमात स्पर्धेत सहभागी गावातील काही गावकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. वाशिम आणि सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनीही यावेळी स्पर्धेत सहभागी तालुक्यांची माहिती देऊन शासन पाणी फाउंडेशनसमवेत समृद्ध गाव निर्मितीसाठी काम करत असल्याचे सांगितले.

खोलवर जाऊन गाव समृद्धीचे काम करणार – आमीर खान

यावेळी आमीर खान म्हणाले, पाणीदार महाराष्ट्राचे स्वप्न उराशी बाळगून पाच वर्षांपूर्वी पाणी फाउंडेशनने महाराष्ट्रात काम सुरु केले. आता या कामाचा अधिक गावात विस्तार न करता काही निवडक गावांमध्ये खोलवर जाऊन गाव समृद्धीचे काम करण्यात येत आहे. त्यामुळेच पाणी फाउंडेशन सध्या फक्त ९०० गावात काम करत असल्याचेही ते म्हणाले.

सहा विषयांवर लक्ष केंद्रित

यावेळी श्रीमती किरण राव, डॉ. अविनाश पोळ यांनीही आपले या लोकचळवळीतील अनुभव सांगितले. तसेच मृद व जलसंधारण, जलव्यवस्थापन, माती संवर्धन, पौष्टिक गवत संवर्धन, वृक्ष लागवड व प्रत्येक शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न १ लाखपर्यंत वाढवणे या सहा महत्त्वाच्या उद्दिष्टांवर आता पाणी फाउंडेशन काम करत असल्याची माहिती दिली.