नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था; कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यात राज्य सरकारला आलेले अपयश; राज्य सरकार वरून जनतेचा उडालेला विश्वास पाहता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली आहे.

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या मागणीचा विचार करू असे आश्वासन दिले असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांची गाडी आणि त्यानंतर झालेल्या घटनाक्रमात महाराष्ट्रच्या गृह विभागाची प्रतिमा कलंकित झाली आहे.कोरोनाच्या महामारीचा राज्यात वेगाने प्रसार होत आहे. असं ही  रामदास आठवले यांनी सांगितलं.