मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्चन्यायालयानं आज दिले. या प्रकरणाचा येत्या १५ दिवसात प्राथमिक चौकशी तपास अहवाल सादर करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत.

सीबीआयंन १५ दिवसात चौकशी पूर्ण करावी, त्यानंतर सीबीआय संचालकांनी कायद्यानुसार पुढची कार्यवाही करण्याबाबत निर्णय घ्यावा, असं न्यायालयानं म्हटलं आहे. मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठानं हे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नैतिकता जपत चौकशी पूर्ण होईपर्यंत राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपानं केली आहे.

परमबीर सिंग यांनी गेल्या २० मार्चला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर हॉटेलमालकांकडून दरमहा १०० कोटी रुपये जमा करण्याचा निर्देश दिल्याचा आरोप केला होता.