नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एकविसाव्या शतकाला “भारताचं शतक” बनवण्याच्या दिशेनं देश सक्षम पावलं टाकत आहे असा विश्वास मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल व्यक्त केला. आपल्या कार्यकाळाच्या अखेरच्या दिवशी त्यांनी राष्ट्राला उद्देशून निरोपाचं भाषण केलं. भारताला अधिकाधिक उत्कृष्ट बनवण्यासाठी झटणाऱ्या प्रत्येक भारतीयाच्या रूपानं आपल्या देशाचं भविष्य सुरक्षित आहे, असं कोविंद म्हणाले. पुढच्या महिन्यात आपण स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करणार आहोत; त्याचबरोबर आपण स्वतंत्र्याच्या शताब्दीकडे नेणाऱ्या २५ वर्षांच्या ‘अमृत काळातही” प्रवेश करत आहोत. ही वर्ष आपल्या देशाच्या प्रगतीपथावरील मैलाचा दगड ठरणार आहेत. हे अमृत पर्व म्हणजे आपण आपल्या क्षमता ओळखून, त्यांना मूर्तरूप देत, जगासमोर “श्रेष्ठ भारत” सादर करण्यापर्यंतचा एक प्रवास आहे असं राष्ट्रपती म्हणाले.