मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या दोन ते तीन दिवसात रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत होईल, असं आश्वासन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलं. आज कोविड टास्कफोर्सची विविध विषया संदर्भात बैठक झाल्यानंतर बातमीदारांशी ते बोलत होते.

बंदी घालण्यात आलेल्या राज्यातल्या १५ निर्यातदारांकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा तयार कुप्या आहेत. त्या कुप्या घेण्या संदर्भात या निर्यातदारांशी चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. तो पर्यंत रेमडेसिवीर आवश्यक रुग्णांनाच द्यावं, असे निर्देश  सर्व रुग्णालयांना  दिल्याचं त्यांनी सांगितलं.

५ राज्यांतून ऑक्सिजन आणण्याची परवानगी केंद्र सरकारनं दिली आहे. मोठ्या टँकर मधून लवकरच हा ऑक्सिजन राज्यात आणला जाईल. तसंच प्रत्येक जिल्ह्यात सरकारी तसंच खासगी रुग्णालयांत ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभारण्यासाठी  विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. काही दिवस ऑक्सिजन वापराचं नियोजन करायला सर्व जिल्हा प्रशासनांना सांगण्यात आलं आहे, असंही ते म्हणाले.