मुंबई : सर्व देशबांधव कोरोनाच्या संकटावर एकजुटीने मात करतील, अशी ग्वाही विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल लोकसभेतून भारतातील सर्व राज्य विधिमंडळाचे पीठासीन अधिकारी, संसदीय कार्यमंत्री, विरोधी पक्षनेते तसेच गट नेते, प्रतोद यांचे समवेत ‘कोविड-19 महामारी की मौजूदा स्थिती – जनप्रतिनिधियों की भूमिका एवं दायित्य |’ (Prevailing COT ID-19 situation and the role and resposibility of public representatives या विषयावर दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला त्यावेळी डॉ.गोऱ्हे बोलत होत्या.

दूरदृष्य प्रणालीद्वारे (Virtal Mode) आयोजित केलेल्या बैठकीत महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.(श्रीमती) नीलम गोऱ्हे, संसदीय कार्यमंत्री अनिल परब तसेच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे सहभागी झाले होते.

यावेळी उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी राज्यातील कोविड-19 चा मृत्यूदर कमी करण्यामध्ये महाराष्ट्र राज्य यशस्वी झाले असून, या संदर्भात घडणाऱ्या यशोगाथासुद्धा लोकसभा तसेच राज्यसभा वृत्तवाहिन्यांद्वारे प्रसारीत करणे आवश्यक असून, कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये राज्य शासनाने समाजातील विविध घटकांसाठी जाहीर केलेले आर्थिक पॅकेज तसेच कामगार व अन्य वर्गासाठी देण्यात येणारी मोफत ‘शिवभोजन थाळी‘ या संबंधी माहिती त्यांनी दिली. केंद्र शासनाकडून ऑक्सिजन व रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा राज्यास त्वरीत उपलब्ध करुन देण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी कोरोना संदर्भात राज्य शासन राबवित असलेल्या विविध योजनांचा आढावा घेऊन असंघटीत क्षेत्रातील कोणीही व्यक्ती उपाशी राहणार नाही अशी ग्वाही दिली तसेच या सदंर्भात राज्य शासन पूर्णपणे पारदर्शकतेने काम करत असून त्यांनी राज्यातील लसीकरण तसेच ऑक्सिजन व रेमडेसिवीर इंजेक्शनची सद्यस्थिती याबाबत उपस्थितांना माहिती दिली. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी या संदर्भातील समन्वयासाठी जिल्हानिहाय एक सामाईक व्यासपीठ गरजेचे असल्याचे सांगितले.

बैठकीस विधान भवन, मुंबई येथून विधानमंडळ सचिवालयाचे सचिव राजेंद्र भागवत, विधानपरिषद सभापती यांचे सचिव महेंद्र काज व अवर सचिव सुनिल झोरे उपस्थित होते.