मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ५२ हजार ४१२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले, ५८ हजार ९२४ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ३५१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यातल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३८ लाख ९८ हजार २६२वर पोचली आहे. यापैकी आत्तापर्यंत ३१ लाख ५९ हजार २४० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर कोरोनाबळींची एकूण संख्या ६० हजार ८२४ वर पोचली आहे.  याबरोबरच राज्यातला कोरोनामुक्तीचा दर वाढून ८१ पुर्णांक ४ शतांश टक्क्यावर पोचला आहे, तर मृत्यूदरातही किंचित घट झाल्यानं तो १ पुर्णांक ५६ शतांश टक्क्यावर आला आहे. सध्या राज्यभरात  ६ लाख ७६ हजार ५२० कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.

मुंबईत काल ८ हजार ५८३ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी पाठवलं. आतापर्यंत ४ लाख ८६ हजार ६२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल ७ हजार ३८१ नवीन रुग्णांची नोंद झाली.

मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी ४७ दिवसांवर आलाय. सध्या  ८६ हजार ४१० रुग्ण उपचार घेत आहेत. काल ५७ रुग्णांचा मृत्यू झाला.

राज्यात मुंबईत काल सर्वाधिक ७ हजार ३८१ नवे कोविड रुग्ण आढळले. मुंबईतील पालिकेच्या जी – नार्थ प्रभागा मधल्या दादर, माहिम परिसरात  कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून वाढते आहे. मात्र आशियातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या धारावी झोपडपट्टीत वाढलेली रुग्णसंख्य़ा मागील चार -पाच दिवसांपासून कमी झाली आहे.

पुणे जिल्ह्यात काल ६ हजार ८६८ कोरोनाबाधित आढळले. तर नागपूर जिल्ह्यात ६ हजार ७४७ रुग्णांची नोंद झाली.

नाशिक जिल्ह्यात काल कोरोना बाधितांच्या संख्येत तब्बल ६  हजार ८४५  रुग्णांची वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून काहीशी कमी झालेली संख्या पुन्हा वाढल्यानं चिंतेचं वातावरण आहे. काल  दिवसभरात ४  हजार ११७  रुग्ण कोरोना मुक्त झाले असून दिवसभरात तब्बल ४० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कोरोना बळींची एकूण संख्या २ हजार ९७५  इतकी झाली आहे.

रायगड जिल्ह्यात काल १ हजार ६९  नवीन  कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण रुग्णांची संख्या  ९१ हजार ४१८ पर्यंत पोहोचली आहे. काल २५ रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू  झाला. तर ९१७ रुग्णांना सुट्टी देण्यात आली. रायगड जिल्ह्यात १० हजार २२१ रूग्ण उपचार घेत आहेत.

सांगली जिल्ह्यात एका दिवसात ९९२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.तर कोरोना मुळे १८  जणांचा मृत्यू झाला.सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात काल ७०९ नवे कोरोना बाधित आढळले तर १७ जणाचा मृत्यू झाला.

परभणी शहरासह जिल्ह्यात काल दिवसभरात ५७३ व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या असून एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २६ हजार ८७ झाली आहे. ७१३ जण काल कोरोनामुक्त झाले. परभणी जिल्ह्यात काल १६ कोरोना बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृत्यूची संख्या ६७१  झाली आहे. ५ हजार ५७४ रुग्ण उपचाराधीन आहेत.

जालना जिल्ह्यात काल दिवसभरात दोन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना संसर्गानं दगावलेल्यांची संख्या आता ६२०झाली आहे.जिल्ह्यात काल ५२१ नवीन रुग्ण आढळून आले. तर ४५३ रुग्णांना उपचारानंतर काल घरी सोडण्यात आलं.

हिंगोली जिल्ह्यात काल ९ कोरोना बाधितांचा  मृत्यू झाला. जिल्ह्यात नव्याने २९१ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर १७२ कोरोनामुक्त झाले.

यवतमाळ जिल्ह्यात काल ३७ कोरोनाबाधितांचे मृत्यू झाले तर ८१० नवे कोरोनाबाधित आढळले. काल ८९२ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.

सिंधुदुर्गात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून काल १५९  जणांचे  अहवाल पॉझिटिव्ह आले. वाशिम जिल्ह्यात काल  ३९५ नवे कोरोनाबाधित आढळले  तर २७९  रुग्ण कोरोनामुक्त झाले तर एकाचा मृत्यू झाला.

चंद्रपूर जिल्ह्यात २ हजार २९७ रुग्ण आढळले.

पालघर जिल्ह्यात एका दिवसांत १ हजार ११  नव्या रुग्णाची नोंद झाली. यात पालघर ग्रामीण भागातल्या ५०३ आणि वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातल्या ९०८  ररुग्णांचा  समावेश आहे. तर एका दिवसांत जिल्ह्यात २८ रुग्णांचा मृत्यू झाला.