शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री अँड. आशिष शेलार यांची घोषणा

पुणे : शालेय क्रीडा मधून बंद झालेले सुमारे 48 खेळ पुन्हा सुरू करण्यात येत आहेत, अशी घोषणा शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याणमंत्री अँड.अशिष शेलार यांनी पुणे येथे केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात आयोजित करण्यात आलेल्या “फिट इंडिया” या मालिकेतील एक कार्यक्रम पुणे वडगाव शेरी येथील महापालिका शाळेत आज आयोजित करण्यात आला होता. पुणे दौऱ्यावर असणारे शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री अँड.अशिष शेलार हे या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले की खेळ हा एकात्मकतेचा भाव जोपासणारा संस्कार आहे.एकजुटीने खेळ खेळल्यानंतर त्यातून समाजात, समूहात राहण्याचा संस्कार मुलांवर होत राहतो. शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्य खेळामुळे जोपासले जाते.
म्हणून खेळ महत्त्वाचे आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला योगा आणि आता एकुणच खेळांसाठी एक लोकचळवळ उभी करण्यास सुरुवात केली आहे.

आपणही त्यांच्या या चळवळीत सहभागी होताना, शालेय क्रीडा विभागात बंद करण्यात आलेले सुमारे 48 खेळ पुन्हा सुरू करण्यात येत आहेत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार माधुरीताई मिसाळ आणि जगदीश मुळीक आदी उपस्थित होते.

क्रीडा संचनालयातर्फे 2017 साली बंद करण्यात आलेल्या 48 खेळ पुन्हा सुरू करण्याचा शासन निर्णय आज तातडीने जारी करण्यात आला आहे. या खेळांंमधे टेनिस, फुटबॉल, लंगडी यांंसह एकुण 48 खेळांचा समावेश आहे.