नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड रुग्णसंख्येत झालेली अभूतपूर्व वाढ लक्षात घेता, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रतिबंधीत क्षेत्रात योग्य कोवीड व्यवस्थापन करून कठोर उपायोजना राबवाव्यात असे निर्देश केंद्र सरकारने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत.

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी , केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक क्षेत्रासंदर्भातील आराखड्याची योग्य अंमलबजावणी करावी अशा आशयाचं पत्र, केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवलं आहे.

लागू केलेल्या निर्बंधांच्या प्रभावी अंमलबजावणी साठी राज्य सरकारं, केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासन, जिल्हा प्रशासन यांनी व्यापक जागृती करून अंमलबजावणी करावी असं या पत्रात म्हटलं आहे.