मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात सर्व १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वार्ताहर परिषदेत सांगितले. यासाठी ६ लाख ५०० कोटी रुपये खर्च येणार असून येत्या ६ महिन्यात सर्वांचं लसीकरण पूर्ण करण्याचं नियोजन असल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र लशींची संख्या कमी असल्यामुळे १ मे पासून सरसकट लसीकरण  होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. कोविन अॅपवर नोंदणी करणं बंधनकारक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. लॉकडाऊन १ मे नंतरही वाढण्याची शक्यता असून लॉकडाऊन ७ किंवा १५ दिवसाचा करायचा ? याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.