महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान

मुंबई : गीत आणि साहित्य मनोरंजनातून जीवन जगण्याची शिकवण देतात. गीत हे साहित्यातून विकसित होत असल्याने गीतांचा साहित्यरूपी अभ्यास व्हावा असे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. गीतांचा साहित्यरूपी अभ्यास होऊन तरुणांमध्ये साहित्य गोडी निर्माण होईल, यातून देशाला भावी साहित्यिक लाभतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान सोहळा चर्चगेट येथील जयहिंद महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे हिंदी भाषा व साहित्याच्या ‍ विकासासाठी कार्यरत साहित्यिकांना पुरस्कृत करण्याकरिता दरवर्षी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो. या पुरस्कार वितरण कार्यक्रमास हिंदी साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ.शितलाप्रसाद दुबे,फिल्मसिटीचे उपाध्यक्ष, अमरजीत मिश्र तसेच विविध क्षेत्रातील साहित्य प्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.

हिंदी अकादमीतर्फे तीन प्रकारचे पुरस्कार दिले जातात. या वर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये २ अखिल भारतीय सन्मान जीवनगौरव पुरस्कार, ८ राज्यस्तरीय सन्मान जीवनगौरव पुरस्कार, तसेच २१ विधा पुरस्कार अश्या एकूण ३१ पुरस्कारांचा समावेश आहे. सर्व पुरस्कार विजेत्यांना अकादमीकडून स्मृतिचिन्ह,सन्मानपत्र व रोख रक्कम दिली जाते.अखिल भारतीय सन्मान जीवनगौरव पुरस्कारासाठी रू. १ लाख, राज्य स्तरीय सम्मान जीवनगौरव पुरस्कारासाठी रू. ५१,००० आणि विधा पुरस्कारासाठी स्वर्ण, रजत, कांस्य अश्या तिन प्रकारात अनुक्रमे रू, ३५,०००/-, रू. २५,०००/- आणि रू. ११,०००/- रोख देण्यात येतात.

श्री. तावडे यावेळी म्हणाले, राज्यातील सांस्कृतिक आणि साहित्यिक ठेवा जपताना विविध साहित्यिकांचे योगदान जपण्याचे काम महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी करीत आहे. त्यामुळेच महाराष्ट्र राज्य हिंदी अकादमीने विविध भाषांतील साहित्याचा अनुवाद हिंदी भाषेत करण्यासाठी प्रयत्न करावा.

महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे हिंदी भाषा व साहित्याच्या ‍विकासासाठी कार्यरत साहित्यिकांना पुरस्कृत करण्याकरिता दरवर्षी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो. महाराष्ट्रातल्या लेखकांनी मराठीबरोबरच इतर भाषांमध्ये लेखन करणेही आवश्यक आहे. आजही ही अकादमी विविध पातळ्यांवर साहित्यिकांची नोंद घेते, त्यांच्या साहित्याचे संवर्धन करते. इतर भाषांतील उच्च दर्जाचे साहित्य हिंदी भाषेत उपलब्ध झाल्यास साहित्यिकांचा हा ठेवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल.

महाराष्ट्र शासनाच्या हिंदी साहित्य अकादमीमार्फत सन २०१८-१९ या वर्षाचे पुरस्कार प्रदान आज  करण्यात आले. हिंदी साहित्य अकादमीच्या पुरस्कारामध्ये सर्वोच्च समजला जाणारा अखिल भारतीय सन्मान जीवनगौरव पुरस्कार डॉ. बलभीमराज गोरे आणि हस्तीमल हस्ती यांना प्रदान करण्यात आला. प्रत्येकी एक लाख रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

यावर्षी ‘अखिल भारतीय सन्मान जीवनगौरव’ पुरस्कारांमध्ये ‘महाराष्ट्र भारती अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार’ डॉ. बलभीमराज गोरे तसेच डॉ.’राममनोहर त्रिपाठी अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार’ हस्तीमल हस्ती यांना प्रदान करण्यात आला.  ‘राज्यस्तरीय सम्मान जीवनगौरव पुरस्कार’पुरस्कारांतर्गत’छत्रपती शिवाजी राष्ट्रीय एकता पुरस्कार’  संजय रघुराज तिवारी, ‘साने गुरूजी राष्ट्रीय एकता पुरस्कार’ साँवरमल सांगानेरिया, ‘पद्मश्री अनंत गोपाल शेवडे हिंदी सेवा पुरस्कार’ डॉ. करूणाशंकर उपाध्याय, ‘डॉ उषा मेहता हिंदी सेवा पुरस्कार’कमलेश बक्षी, ‘गजानन माधव मुक्तिबोध मराठी भाषी हिंदी लेखक पुरस्कार’ डॉ. सुभाष गोविंद महाले, ‘कांतीलाल जोशी इतर हिंदी भाषी हिंदी लेखक पुरस्कार’वीरेन्द्र याग्निक, ‘व्ही शांताराम ललित कला हिंदी विशिष्ट सेवा पुरस्कार’ योगेश गौड़, ‘सुब्रमण्य भारती हिंदी सेतु विशिष्ट सेवा पुरस्कार’ शेखर सेन यांना प्रदान करण्यात आला.  ‘विधा’ पुरस्कारांतर्गत ‘काव्य’ या विधासाठी देण्यात येणारा ‘संत नामदेव पुरस्कार’ कृपाशंकर मिश्र यांना स्वर्ण, संजय रमाशंकर शर्मा (संजय अमान) आणि नरसिंह बहादुर सिंह (नादान) – (संयुक्त)  यांना रजत तसेच मंजू तिवारी यांना कांस्य पुरस्कार देण्यात आला. ‘कहानी’ या विधासाठी देण्यात येणारा’मुंशी प्रेमचंद पुरस्कार’ जितेन्द्र भाटिया यांना स्वर्ण, ममता सिंह यांना रजत, तसेच गुरूप्रताप शर्मा (आग) यांना कांस्य पुरस्कार देण्यात आला. ‘निबंध’ या विधासाठी देण्यात येणारा ‘आचार्य रामचंद्र शुक्ल पुरस्कार’ संजीव निगम यांना स्वर्ण, तसेच अलका रागिनी यांना कांस्य पुरस्कार देण्यात आला. ‘समीक्षा’ या विधासाठी देण्यात येणारा ‘आचार्य नंददुलारे वाजपेयी पुरस्कार’ डॉ. सत्यवती चौबे यांना स्वर्ण, डॉ. सतीश यादव यांना रजत, तसेच डॉ. सुधीर वाघ यांना कांस्य पुरस्कार देण्यात आला. ‘अनुवाद’ या विधासाठी देण्यात येणारा ‘मामा वरेरकर पुरस्कार’रविंद्र देवघरे (शलभ) यांना स्वर्ण व भगवान वैद्य प्रखर यांना रजत तसेच सेवक नैयर यांना कांस्य पुरस्कार आला. ‘वैज्ञानिक तकनीकी’ या विधासाठी देण्यात येणारा ‘होमी जहांगीर भाभा कांस्य पुरस्कार’  वामनराव राघोबाजी गाणार यांना देण्यात आला. ‘नाटक’ या विधासाठी देण्यात येणारा ‘विष्णुदास भावे पुरस्कार’सलिल चंद्र मिश्र (सलिल सुधाकर) यांना स्वर्ण तसेच विनोद नायक यांना कांस्य पुरस्कार देण्यात आला. ‘जीवनी-परक साहित्य’ या विधासाठी देण्यात येणारा’काका कालेलकर रजत पुरस्कार’ डॉ. रमेश मिलन यांना देण्यात आला.’पत्रकारिता-कला’ या विधासाठी देण्यात येणारा ‘बाबुराव विष्णु पराडकर स्वर्ण पुरस्कार’. महेन्द्र मोदी यांना देण्यात येणार आहे. ‘लोकसाहित्य’ या विधासाठी देण्यात येणारा ‘फणीश्वरनाथ रेणू कांस्य पुरस्कार’ श्यामलता गुप्ता यांना देण्यात आला. ‘बालसाहित्य’ या विधासाठी देण्यात येणारा ‘सोहनलाल व्दिवेदी रजत पुरस्कार’ डॉ. प्रमोद शुक्ल यांना देण्यात आला.